गुरू तेग बहादूर (पंजाबी: ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ; (गुरुमुखी); १ एप्रिल १६२१ – ११ नोव्हेंबर १६७५) हे शीख धर्माचे संस्थापक असलेल्या दहा शीख गुरूंपैकी नववे गुरू होते. त्यांनी १६६५ पासून १६७५ मध्ये त्यांचे शिरच्छेद होईपर्यंत शिखांचे नेतृत्व केले. त्यांचा जन्म १६२१ मध्ये भारतातील पंजाबमधील अमृतसर येथे झाला. ते सहावे शीख गुरू गुरू हरगोबिंद साहिब यांचे सर्वात धाकटे पुत्र होते. एक तत्वनिष्ठ आणि निर्भय योद्धा मानले जाणारे गुरू तेग बहादूर हे एक विद्वान आध्यात्मिक अभ्यासू आणि कवी होते. त्यांनी रचलेली ११५ स्तोत्रे (hymns) गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, जो शीख धर्माचा मुख्य धर्मग्रंथ आहे. त्यांनी १६६४ मध्ये आनंदपूर साहिबची स्थापना केली.
गुरू तेग बहादूर यांना सहावा मुघल सम्राट औरंगजेब याच्या आदेशानुसार भारतातील दिल्ली येथे फाशी देण्यात आली. दिल्लीतील गुरुद्वारा शीशगंज साहिब आणि गुरुद्वारा रकाब गंज साहिब ही पवित्र ठिकाणे गुरू तेग बहादूर यांच्या फाशीच्या आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्मृती जपतात. त्यांचा हौतात्म्य दिन (शहीद दिवस) दरवर्षी २४ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जातो.
गुरू तेग बहादूर आणि औरंगजेब यांच्यातील संघर्षाची कारणे आणि त्यानंतर गुरूंच्या फाशीच्या कारणांबद्दल ऐतिहासिक स्रोतांमध्ये भिन्न मते आहेत. शीख नोंदीनुसार, गुरूंनी औरंगजेबाच्या असहिष्णू धोरणांविरुद्ध गैरमुस्लिमांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांचे रक्षण केले, तर मुघल नोंदीनुसार गुरू पंजाब प्रदेशात गैरमुस्लिमांकडून सक्तीने कर गोळा करत होते. याव्यतिरिक्त, गुरूंच्या कुटुंबातील काही सदस्यांनी, ज्यांचा गुरुपदावर दावा होता, त्यांनी औरंगजेबाला गुरूंच्या विरोधात भडकवले होते.
गुरू तेग बहादुर
या विषयावर तज्ञ बना.