शीर्षक गीत

या विषयावर तज्ञ बना.

चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला किंवा दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमाआधी वाजवल्या जाणाऱ्या गीताला शीर्षक गीत म्हणतात.

दूरदर्शन या भारतीय सरकारी दूरचित्रवाणीवरील सुरुवातीच्या काळातील हमलोग, बुनियाद, सुरभी, मालगुडी डेझ, रामायण, महाभारत या हिंदी मालिकांची तर गोट्या, संस्कार, दामिनी, महाश्वेता, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, स्वामी आदी मराठी मालिकांची शीर्षक गीते ही त्यातील काही ठळक उदाहरणे होती.

गोट्या मालिकेचे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे बियाणे रुजावे माळरानी खडकात’ संस्कार मालिकेचे तेज स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार किंवा स्वामी मालिकेचे माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले ही शीर्षक गीते प्रसिद्ध झाली.

आल्फा मराठी वाहिनी (आजच्या झी मराठी)वरील पहिली महामालिका म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या ‘आभाळमाया’ या मालिकेचे ‘उडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास, कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया, सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घननीळा डोह, पोटी गूढमाया, आभाळमाया’..हे देवकी पंडित यांनी गायलेले, मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेले आणि संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत अमाप लोकप्रिय झाले. खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’ने घातला असे म्हणतात.

पुढे ‘झी मराठी’वरील जवळपास सगळ्याच मालिकांची शीर्षक गीते गाजली, रसिकांच्या ओठावर रुळली आणि अनेकांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीची कॉलर ट्यून झाली. ‘झी मराठी’ पाठोपाठ ‘ई टीव्ही मराठी’ (आत्ताची कलर्स मराठी), ‘मी मराठी’ (या वाहिनीचे ‘मी मराठी, मी मराठी’ हे शीर्षक गीतच गाजले), ‘स्टार प्रवाह’ आदी मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील अनेक मालिकांची शीर्षक गीते लोकप्रिय झाली. यात ‘राजा शिवछत्रपती’, अग्निहोत्र’ (स्टार प्रवाह), तसेच ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘कळत नकळत’, ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘असंभव’, (सर्व झी मराठी) या सह अन्य विविध मालिकांच्या शीर्षक गीतांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मालिकांच्या या शीर्षक गीतांनी रोहिणी निनावे, श्रीरंग गोडबोले, सौमित्र, गुरू ठाकूर, अरुण म्हात्रे, अश्विनी शेंडे, नीतीन आखवे असे चांगले तरुण गीतकारांबरोबरच अशोक पत्कींपासून ते नीलेश मोहरीर, राहुल रानडे अशा संगीतकारांची नावं घराघरात लोकप्रिय केली. तर देवकी पंडित, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, रवींद्र साठे अशा गायक व गायिकांनी या शीर्षक गीतांना मोलाचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →