महादेव विनायक गोखले

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. महादेव विनायक गोखले (२१ नोव्हेंबर, इ.स. १९२९ - २८ ऑगस्ट, इ.स. २०१३) हे मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम. ए. केल्यावर, ’आरती वाङ्‌मयाचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पी‍एच.डी मिळवली. गोखले हे पुण्याच्या वाडिया कॉलेजात २९ वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातही अध्यापनाचे काम केले आहे. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी त्यांना १९८८ मध्ये मिळाली होती.

गोखले सुरुवातीला गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत असत. हौशी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. चित्रपटक्षेत्रातही त्यांनी काही काळ दिग्दर्शन केले.

डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्‌मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते.

अध्यापन काळातच म.वि. गोखले लेखनाकडे वळले. बालसाहित्य, संत साहित्य व प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली पुस्तके ९२हून अधिक आहेत. पुस्तकांसाठी त्यांना अनेक खासगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यांसारख्या कादंबऱ्या, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण यांसारखी चरित्रे, अनेक संपादित ग्रंथ, प्रबंध असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.

निवडक चरित्रे या पुस्तकाच्या पहिल्या भागात अ‍ॅनी बेझंट, ईश्वरचंद्र विद्यासागर, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, जगदीशचंद्र बोस, महात्मा जोतीराव फुले, दयानंद सरस्वती, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बिपिनचंद्र पाल, मदनमोहन मालवीय, महात्मा गांधी, महादेव गोविंद रानडे, मादाम भिकाजी कामा, रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, स्वामी विवेकानंद, एम. विश्वेश्वरय्या, विष्णूशास्त्री चिपळूणकर, नाना शंकरशेट, बिपिनचंद्र पाल, या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.

त्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात श्री अरविंद घोष, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, फिरोजशाह मेहता, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, राजेंद्रप्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.व्ही. रामन, राम मनोहर लोहिया, रासबिहारी बोस, लालबहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरोजिनी नायडू, वि. दा. सावरकर, सुभाषचंद्र बोस या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.

डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →