इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

या विषयावर तज्ञ बना.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

नोव्हेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघ पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने जुलै २०१६ मध्ये दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्या. कसोटी मालिका समाप्त झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि एकदिवसीय सामन्यासाठी पुन्हा भारतात आला.

भारताने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुधारित डीआरएस पद्धत वापरण्यास सहमती दर्शवली. २००८ मध्ये एकदा चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा समावेश असलेल्या द्विपक्षीय मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली गेली. परंतू, हॉटस्पॉटचा वापर केला गेला नाही.

सदर कसोटी मालिका ॲंथोनी डीमेलो चषकासाठी खेळवली गेली, ज्यामध्ये भारताने ५-सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली. मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित करून कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली. पाचव्या कसोटीतील विजयामुळे भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहिला आणि स्वतःचा १७ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम मोडला. त्याशिवाय भारताने एका वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक ९ कसोटी सामने जिंकले.

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्या आधी, महेंद्रसिंग धोणीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधार पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोणीचा शेवटचा सामना होता इंग्लंड XI विरुद्ध १० जानेवारी २०१७ रोजी झालेला ५०-षटकांचा सामना.

एकदिवसीय मालिकेमध्ये तब्बल २०९० धावा केल्या गेल्या, तीन किंवा कमी सामन्यांच्या मालिकेमधील हा एक विक्रम आहे. सर्वच्या सर्व डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा नोंदवल्या गेल्या. भारताने एकदिवसीय आणि टी२० मालिका २-१ अशा जिंकल्या. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →