१९८८-८९ शारजा चॅम्पियन्स चषक

या विषयातील रहस्ये उलगडा.

१९८८-८९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १६-२२ ऑक्टोबर १९८८ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह मधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. तिन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एक एक सामने खेळले. गट फेरीतील दोन्ही सामने जिंकत पाकिस्तानने अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारत आणि वेस्ट इंडीज मध्ये झालेल्या एकमेव उपांत्य सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडीज संघ देखील अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात पाकिस्तानवर वेस्ट इंडीजने १९ धावांनी विजय मिळवून चषक जिंकला. विजेत्या वेस्ट इंडीजला ३० हजार अमेरिकन डॉलरचे पारितोषिक देण्यात आले. उपविजेत्या पाकिस्तानला पुरस्कारस्वरूप २० हजार अमेरिकन डॉलर मिळाले तर तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भारतीय संघाला १५ हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस मिळाले. वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिजने स्पर्धेमध्ये सर्वाधिक २४३ धावा करत मालिकावीराचा मान मिळवला. तसेच वेस्ट इंडीजचा कर्टली ॲम्ब्रोज आणि भारताचा संजीव शर्मा या दोघांनी प्रत्येकी ८ बळी मिळवले.

या स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नातून पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू मुनीर मलीक आणि भारताचे माजी क्रिकेट खेळाडू भागवत चंद्रशेखर यांना प्रत्येकी १५ हजार अमेरिकन डॉलरचे आर्थिक सहाय्य देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →