१९७८ महिला क्रिकेट विश्वचषक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९७८ महिला क्रिकेट विश्वचषक ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९७८ मध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही दुसरी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९७३ मध्ये इंग्लंडमध्ये झाली होती. माजी विजेते इंग्लंड होते. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला वहिला महिला विश्वचषक खेळला. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले.

योजनेनुसार ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित केली जाणार होती, परंतु वर्णभेदाच्या मुद्द्यावरून दक्षिण आफ्रिकेवर जगाने क्रीडा क्षेत्रात बहिष्कार घातल्याने यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडून काढून घेण्यात आले. यजमान निवडीसाठी भारताने बोली लावली. एकमात्र उमेदवार म्हणून १९७८ च्या महिला विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ४ देशांनी भाग घेतला. यजमान भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला. आणखी दोन आमंत्रित देश वेस्ट इंडीज आणि नेदरलँड्स या देशांचे संघ आर्थिक कारणांमुळे या विश्वचषकात सहभाग घेऊ शकले नाहीत. त्यामुळे फक्त ४ देशांमध्ये ही स्पर्धा झाली. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी देशांमध्ये झालेला हा विश्वचषक होता.

या स्पर्धेत एकूण ६ सामने झाले. स्पर्धा गट फेरी प्रकारात झाली. सर्व संघांनी एकूण ३ सामने खेळले. शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर मात करून गुणफलकात पहिल्या स्थानावर पोचत ऑस्ट्रेलियाने पहिला वहिला विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाने सर्व साखळी सामने जिंकले. इंग्लंड संघ ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवत २रे स्थान अर्थात उपविजेतेपद पटकावले. न्यू झीलंडला फक्त एकच सामना जिंकता आला तर भारतीय महिला संघाचा तीनही सामन्यांमध्ये पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या मार्गरेट जेनिंग्स हिने स्पर्धेतील सर्वाधिक १२७ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्याच शॅरन हिल हिने सर्वाधिक ७ बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →