सम्राट अशोक (इ.स.पू. ३०४ - मृत्यू इ.स.पू. २३२) हे भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते. त्यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक आणि अशोक द ग्रेट नावांनीही ओळखले जाते. अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.
सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख सन १८३७ मध्ये वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्ममी,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची तत्त्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आला विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्याने धर्म प्रसारासाठी पाठवले धम्मचक्र परिवर्तन करणारा अशोक हा प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक ठरला आहे इतिहासाला युगानुयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल मानवी कल्याणासाठी पथक प्रयत्न करणारा प्रजा हीच दक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी अशोकाच्या कार्याचा गौरव केलेला आहे
माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ मध्ये म्हणतात की, ‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा सम्राट् अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.’’
सम्राट अशोक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.