मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने सिकंदरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.
५०,००,००० वर्ग चौरस किमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. नंतर सम्राट अशोकाने कलिंग जिंकून घेतला. अशोकांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करून मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.
चंद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले.
कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून या धर्माचा श्रीलंका, आग्नेय व पश्चिम आशिया तसेच युरोपमध्ये प्रसार केला. अशोकाचे सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील सिंह व अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे.
या साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५ ते ६ कोटी इतकी होती व हे साम्राज्य हे जगातील लोकसंख्येनुसार मोठे साम्राज्य होते.
मौर्य साम्राज्य
या विषयावर तज्ञ बना.