संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिला संत असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनतो, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व. साधू, संत, सज्जन आणि भगवद्भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्गीतेमधील दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसंन्यासी, हे सर्व एकच. ब्रह्मनिष्ठ किंवा ईश्वरभावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते. भागवतात अशा महात्म्यांना "भागवत" किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात. हे भागवतोत्तम सत्पुरुष समदर्शी असतात. सम याचा एक अर्थ व्यावहारिकाच्या म्हणजे उपाधीच्या पलीकडचा, तर सम शब्दाचा दुसरा अर्थ ब्रह्म म्हणजेच सर्वच ब्रह्म किंवा ईश्वर पाहणारा, असा आहे. मुण्डकोपनिषदात "श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं" अशी सन्तांची लक्षणे सांगितली आहेत. श्रुतिसम्पन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा संतांचा महत्त्वाचा गुण. श्रुतिसम्पन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले संत कृपेचा वर्षाव करतात.
संताची अभंगवाणी हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे परमभूषण आहे. संताची अभंगवाणी हे महाराष्ट्राच्या मराठी भाषेचे अक्षर लेणे होय.
साधुसंत मायबाप तिंही केले कृपादान । पण्ढरिये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान ।।
आणि संतकृपेनेच ही भूलोकीच्या वैकुण्ठाची वाट गवसते.
संत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.