संजय विठ्ठल कळमकर : (जन्म-२६ जून १९६८) हे विनोदी लेखक, प्रभावी वक्ते आणि कथाकथनकार आहेत. त्यांचे शिक्षण चिचोंडी पाटील ( ता.जि. अहिल्यानगर) येथे तर महाविदयालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. एम.पीएचडी असलेले कळमकर सध्या अध्यापनाचे कार्य करतात.
डॉ .संजय कळमकर
जन्मगाव - शेंडी (त.जि.अहिल्यानगर )
जन्म - २६ जून १९६८
राष्ट्रीयत्व - भारतीय
कार्यक्षेत्र - कथा, कादंबरी, व्याख्याने, विनोदी कथाकथन
पुरस्कार - पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार
मृत्यंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार
ग.ल.ठोकळ पुरस्कार {म.सा.प.} पुणे...इत्यादी.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कला, प्रथम वर्ष, मराठी अभ्यासक्रमात ‘शुभमंगल सावधान’ या विनोदी कथेचा समावेश.
शब्दगंध साहित्य संमेलन, कुसुमाग्रज साहित्य संमेलन, कृष्णा साहित्य संमेलन, राम नगरकर साहित्य संमेलन,आई साहित्य संमेलन मालेगाव इत्यादी विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद .
व्यंकटेश माडगुळकर,शंकर पाटील, द.मा.मिरासदार, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे या साहित्यिकांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून या मातीत कथाकथनाचे मळे फुलवले. या प्रत्येकाची धाटणी वेगळी होती. त्यांचाच वसा संजय कळमकर पुढे चालवत आहेत. त्यांची शैली या सर्वांपेक्षा स्वतंत्र आहे. त्यांच्या सारे प्रवासी घडीचे, नाम्याचा सिनेमा, बे एक बे, टोपीवाले कावळे,शुभमंगल सावधान या विनोदी कथा लोकप्रिय आहेत. या कथेतील विनोदामागे वास्तवता आणि कारुण्याच्या छटा दिसतात.
कथाकथनाच्या शैलीपेक्षा कळमकर यांची भाषणाची शैली वेगळी आहे. विनोद व दाखल्यांची पेरणी करून ते श्रोत्यांसमोर सामाजिक. शैक्षणिक, कौटुंबिक वास्तव ठेवतात तेव्हा प्रत्येक श्रोता हसता हसता अंतर्मुख झाल्याशिवाय रहात नाही. त्यांच्या राजकीय कोट्या अफलातून असतात. त्यांचे हसायदान हे youtube chhanal अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
संजय कळमकर यांच्या नावावर नऊ कादंब-या व तीन कथासंग्रह आहेत. सकाळ, लोकमत, पुण्यनगरीसारख्या अनेक वृत्तपत्रात त्यांनी सदरलेखन केलेले आहे. त्यांचे सकाळ वृत्तपत्रातील ‘ हलकंफुलकं’ हे साप्ताहिक सदर विशेष गाजले.त्यांच्या कथा व कादंब–यांमध्ये ग्रामीण व शहरी समाजजीवनाचे कंगोरे प्रभावीपणे आलेले दिसतात. त्यांची ‘सारांश शून्य’ ही कादंबरी ग्रामीण शिक्षण आणि व्यवस्थेवर उपहासात्मक कोरडे ओढते तर ‘झुंड’ या कादंबरीत ग्रामीण पत्रकारितेचा उभा-आडवा छेद वाचायला मिळतो.त्यांची ‘ एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट’ ही कादंबरी तर ‘कल्पना विश्वातून वास्तव दाखवणारी अद्भुत साहित्यकृती आहे.’
कळमकरांच्या कथा व कादंबरी-या ग्रामीण व नागर अशा दोन्ही समाजजीवनाचे दर्शन समर्थपणे घडवतात. जगण्यातील विसंगती,लबाडी त्यातून निर्माण होणारा विनोद ते उपहास,विडंबनातून मांडतात तेव्हा रंजनाबरोबर त्यामागचे भेदक वास्तवही उलगडत जाते. त्यांच्या लेखनाची व भाषणाची भाषा सहजसोपी ,प्रवाही आणि नैसर्गिक असल्याने ते एक चिंतनशील विनोदी लेखक म्हणूनच नव्हे तर व्याख्याते व कथाकथनकार म्हणूनही लोकप्रिय आहेत.
संजय कळमकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.