वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

या विषयावर तज्ञ बना.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. त्याच वर्षी जून १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अनपेक्षितपणे भारताने वेस्ट इंडीजचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घ्यायचा ह्या मानसिकतेने आणि तयारीनिशी वेस्ट इंडीज संघ भारतात खेळायला उतरला. भारतात वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच एकदिवसीय सामने खेळले. भारताच्या भूमीवर पहिल्यांदाच पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविण्यात आली.

भारताला या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. जरी भारताची कामगिरी म्हणावी तशी चांगली नव्हती तरी या दौऱ्यात अनेक विक्रम मोडले गेले. अनेक खेळाडू निवृत्त झाले तर अनेक नवोदित खेळाडूंनी पदार्पणे केली. भारतीय कर्णधार कपिल देव याने कसोटीच्या एका डावात ८३ धावा देऊन ९ गडी बाद करून त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीत विक्रम केला. ५व्या कसोटीत भारताचे फलंदाज सुनील गावसकर यांनी अत्यंत खराब कामगिरी केल्याने चिडलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. परंतु ६व्या आणि अखेरच्या कसोटीत सुनील गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च नाबाद २३६ धावा केल्या. सुनील गावसकर यांनी नाबाद २३६ धावा करून ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडला आणि भारतीय फलंदाज आणि माजी विनू मांकड यांची भारतीय फलंदाजातर्फे कसोटीत केलेली सर्वोच्च २३१ धावांचा विक्रम मोडला. कसोटीत खराब कामगिरी आणि ढेपाळलेली मानसिकता पाहून देशभर संघाविरोधात आंदोलने झाली. काही आंदोलकांद्वारे चालू कसोटीत घुसून खेळपट्टी खोदण्याचाही वादग्रस्त प्रकार घडला. ६व्या कसोटीत वेस्ट इंडियन खेळाडू विन्स्टन डेव्हिस याच्यावर काही संतप्त प्रेक्षकांनी दगडफेक केली. ही घटना घडताच कर्णधार क्लाइव्ह लॉईड आणि उर्वरीत वेस्ट इंडीजने खेळ थांबवला. त्यानंतर पूर्ण वेस्ट इंडीज संघाच्या सुरक्षेची जवाबदारी तत्कालिन मद्रास प्रांताचे राज्यपाल सुंदरलाल खुराणा यांनी घेतल्यावरच वेस्ट इंडीजने मालिका सुरू ठेवली. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका पाहुण्या वेस्ट इंडीजने अनुक्रमे ३-० आणि ५-० अश्या पद्धतीने जिंकल्या.

अँडी रॉबर्ट्स आणि यशपाल शर्मा हे दोघे महान खेळाडू या मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त झाले. तर अनेक नवोदित खेळाडू - रिची रिचर्डसन, चेतन शर्मा, नवज्योतसिंग सिद्धू आणि राजू कुलकर्णी या पुढे प्रसिद्धी मिळवलेल्या क्रिकेटपटुंनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →