विलास जैतापकर (जन्म : मुंबई, १४ मार्च १९४८; - मुंबई, ३० एप्रिल २००५) यांना नव्या पिढीचे शाहीर म्हणले जाते. शाहिरी परंपरेचा नंदादीप तेवत ठेवण्यामध्ये शाहीर विलास जैतापकर यांचेही मोठे योगदान होते.
विलास जैतापकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची, संगीताची, शाहिरीची ओढ होती. पुढे त्यांनी ‘शाहीर विलास जैतापकर पार्टी’ काढली व गिरगाव, गिरणगावसह मुंबईबाहेरही शेकडो कार्यक्रम केले. जैतापकरांना मराठी भाषा, मराठी अस्मितेचा प्रचंड अभिमान होता. ‘युवक बिरादरी’ या सांस्कृतिक संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते.
विलास जैतापकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते संत गाडगेबाबा अभियानापर्यंतच्या सामाजिक-राजकीय कार्यांत सतत आघाडीवर असत. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातील ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ या गीताचे तेच गीतकार होते. गाडगेबाबा अभियानात जैतापकरांनी सादर केलेली ‘स्वच्छतेचा पांडुरंग’ ही कलाकृती महाराष्ट्रात कमालीची गाजली.
जैतापकरांचा गणपतीची गाणी लिहिण्यात तर हातखंडा होता. आजही गणेशोत्सवात जैतापकर यांनी लिहिलेली गाणीच प्राधान्याने ऐकायला मिळतात. त्यांच्या सुमधुर गीतांनी रसिकांना, गणेशभक्तांना अक्षरशः वेड लावले होते. ही गीते गणेशोत्सवातले खास आकर्षण असते.
पछाडलेला या मराठी चित्रपटात जैतापकारांनी रचलेली गीते आहेत. विलास जैतापकरांची गीते असलेले ४०हून अधिक आल्बम आहेत आणि त्यांत त्यांची सुमारे २८० गाणी आहेत. ही गाणी अशोक खरे, विजय सरतापे, विनोद साठे, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, श्रीकांत नारायण, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, आदी गायकांनी गायली आहेत.
विलास जैतापकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?