रजनी जोशी या मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या एक गायक-अभिनेत्री आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांच्याइतक्या वैविध्यपूर्ण भूमिका क्वचितच कुणी केल्या असतील. इ.स. १९६३ साली काम करायला सुरुवात केल्यापासून ५२ वर्षात त्यांनी कित्येक नाटकांचे हजारो प्रयोग केले आहेत. यांतल्या बहुतेक भूमिका त्यांचा जोरकस आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांना मिळालेल्या आहेत. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'संगीत सौभद्र‘चे सगळ्यात जास्त प्रयोग रजनी जोशी यांनी केले असे त्यांनी म्हणले आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाची नायिका, हीही त्यांची ओळख आहे. कारण साहित्य संघाने आणलेल्या बहुतांशी प्रत्येक संगीत नाटकात त्यांनी काम केले आहे. संगीत रंगभूमीवर त्यांची दाजी भाटवडेकर यांच्याशी विशेष जोडी जमली होती. संगीत रंगभूमीवर त्या केवळ गात बसल्या नाहीत, तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संगीत रंगभूमीची सेवा केली आहे. सुहासिनी मुळगावकर यांनी केलेल्या शतरंगी संगीत किंवा गोविंदराव टेंबेंवरील कार्यक्रमात रजनीबाईंचा मुख्य पुढाकार होता. जशी 'सारेगमा' स्पर्धा असते, तसा 'रत्नपारखी योजना' नावाचा उपक्रम सुहासिनी मुळगावकर एकेकाळी चालवत, त्यातही रजनीताई स्पर्धकांना मार्गदर्शन करत.
विद्याधर गोखले प्रतिष्ठान या संस्थेत रजनी जोशी नाट्यसंगीत शिकवीत. संगीत शिक्षिका प्रा. भाग्यश्री लागवणकर या त्यांच्या अनेक विद्यार्थिनींपैकी एक होत.
रजनी जोशी
यामागील विज्ञान आणि इतिहास.