सांगली जिल्हयात कृष्णा नदी्च्या काठावर बहे-बोरगाव नावाचे बेट आहे.
कृष्णाबाईचा प्रवाह दुभंगुन मध्यभागी बेट तयार झाले आहे.
समर्थ रामदास या बेटावर ध्यानाला बसले असतांना त्यांना अशी स्पंदने जाणवली की, हे ठिकाण हनुमंताचे आहे.
रावण वधानंतर राम, लक्ष्मण, सीता अयोध्येस परत येत
असतांना त्या बेटावर थांबले होते.
कृष्णाबाईच्या काठी रामचंद्र संध्यावंदन करित असतांना कृष्णाबाईला अचानक पुर आला.
पुरामुळे रामचंद्रांच्या उपासनेत विघ्न येईल, अशी हनुमंताला शंका आली.
म्हणुन हनुमंताने पर्वतासारखे विराट रूप धारण करून आपल्या
दोन्ही बाहुंनी कृष्णाबाईचा प्रवाह अडविला.
कृष्णाबाई दुतर्फा होऊन वाहु लागली आणि मध्ये तयार झालेल्या
बेटावर प्रभु रामचंद्र संध्यावंदन करीत राहिले.
आपण अशा पवित्र बेटावर ध्यान करीत आहोत, या कल्पनेने
समर्थ रोमांचीत झाले.
ज्या हनुमंताने हे पाणी अडविले त्याचे अस्तित्त्व इथे कुठेतरी असले
पाहिजे, असे समर्थांना वाटु लागले.
हनुमंताच्या शोधासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली.
समर्थ पट्टीचे पोहणारे होते.
त्यांचा कुंभकाचा अभ्यास दांडगा असल्यामुळे एखाद्या पाणबुड्याप्रमाणे
ते दिर्घकाळ पाण्यात राहु शकत.
समर्थांनी कृष्णेच्या जलाशयातुन हनुमंताची मुर्ती शोधुन काढली.
आजही बहे-बोरगावला हनुमंताची भव्य मुर्ती पहायला मिळते.
समर्थांनी शेकडो हनुमंताची मंदिरे स्थापन केली.
त्यांतील अकरा मारुती मंदिरे महत्त्वाची मानली जातात.
चाफळातील दोन, शिंगणवाडी, माजगांव, उंब्रज, मसुर,
शहापुर, बहे-बोरगाव, बत्तीस शिराळा, मनपाडळे आणि पारगांव
या अकरा मारुतींत बहे-बोरगावचा नंबर लागतो
बोरगाव (सांगली)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?