कोणीही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस (पारितोषिक), पदक, चषक (करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल, स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते त्या वस्तुस पुरस्कार म्हणतात. ज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थांच्या मुखपत्रांतून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त (Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागतेच असे नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा अयोग्य आहे. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात.
भारतावर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. त्याशिवाय आजही लोकांनी महान व्यक्तींना दिलेल्या क्रांतिवीर, क्रांतिसिंह, महात्मा, लोकनायक, लोकमान्य, लोकशाहीर, सेनापती, स्वातंत्र्यवीर, हिंदुहृदयसम्राट आदी उपाधी, त्या त्या व्यक्तीच्या नावाआधी लावण्याचा प्रघात आहे. असे असले तरी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न आदी उपाध्या नावाआधी लावायाला मनाई आहे.
पुरस्कारांच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतो. महाराष्ट्र सरकार ग्रंथलेखकांना देत असलेले अगणित पुरस्कार हे याचे जिवंत उदाहरण आहे. रामदास कामत यांना राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार देताना सुरेश खरे यांनी हाच शेरा मारला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फेदेखील पुरस्कार दिले जातात. टप्पू सुलतान (मुकुंद टाकसाळे) यांनी या समारंभाचे यथातथ्य पण विनोदी चित्रण लोकसत्तेतील एका लेखात केले होते.
पुरस्कार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.