जयराम शिलेदार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जयराम शिलेदार (६ डिसेंबर, इ.स. १९१६ - नोव्हेंबर ६, १९९२) हे मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते होते. जयराम शिलेदारांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे श्रीराम मंदिरात १९५० साली गायिका-अभिनेत्री प्रमिला जाधव जयमाला यांच्याशी झाला. कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार (दीप्ती भोगले) या त्यांच्या कन्या होत. अभिनेता किरण भोगले हा जावई.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या. संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली होती. जयराम शिलेदार यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. परिणामी त्यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत नाटकांच्यामुळेच, संगीत रसिकांची पावले पुन्हा नाट्यगृहाकडे वळली. नव्या पिढीलाही त्यांनी संगीत नाटकांचे वेड लावले. ते वाढवले आणि युवा पिढीनेही संगीत नाटकाची ही परंपरा पुढे चालवायसाठी प्रयत्‍नही केले. ’मराठी रंगभूमी’ (स्थापना १० ऑक्टोबर १९४९) ही त्यांची संस्था रसिक मान्य झाली ती, या कुटुंबाने पैसा, प्रसिद्धी, संपत्ती, या कशाचाही मोह न ठेवता फक्त मराठी रंगभूमीवर संगीत नाटकेच अखंडपणे सुरू ठेवल्याने. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, पणजी या मोठ्या शहरांसह ’मराठी रंगभूमी'ने इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, बंगलोर, कलकत्ता, या शहरातही संगीत नाटकांचे महोत्सव करून मराठी संगीत रसिकांची अभिरुची जपली. संगीताच्याच नव्हे तर रंगभूमीच्या क्षेत्रातही मराठी संगीत नाटकांनी जी नवी परंपरा निर्माण झाली, ती संगीत नाटकातल्या कथानक आणि संगीताच्या संगमानेच होय.

जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी ’मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले.

वि.भा. देशपांडे यांनी दीड तासात आटोपेल इतके संक्षिप्‍त करून दिलेल्या संगीत सौभद्र आणि संगीत रामराज्य वियोग या नाटकांचे यशस्वी प्रयोग जयराम शिलेदारांनी दिल्ली आकाशवाणीवरून सादर केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →