गर्वनिर्वाण

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राम गणेश गडकरी यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण' नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल.

राम गणेश गडकरी यांनी इ.स. १९०८मध्ये ’गर्वनिर्वाण’ लिहायला आरंभ केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते लिहून पूर्ण झाले. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; गणपतराव बोडस हे दिग्दर्शनाबरोबरच ‘हिरण्यकश्यपू’ची, बालगंधर्व ‘कयाधू’ची म्हणजे प्रल्हादाच्या आईची, तर जोगळेकर ‘लोकपाला’ची भूमिका करणार होते. पण यात काम करणाऱ्या गडकऱ्यांच्या एका हितशत्रू मित्र नटाने, त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात निनावी लिहिले होते की, ‘‘जॅक्सनच्या खुनामुळे राजद्रोहाचा आरोप करून, पुरावा या दृष्टीने किर्लोस्कर मंडळी गर्वनिर्वाण हे राजकीय नाटक बसवत आहे.’’ ‘किर्लोस्कर’वर ब्रिटिशांची वक्रदृष्टी होतीच; पण या पत्राने आगीत तेल ओतले गेले. कलाकारांमध्येही अनेक कारणांनी सुंदोपसुंदी वाढली. अशा रीतीने १९१०मध्ये ते नाटक मंचावर येणे रद्द झाले. नंतर १९१४मध्ये हे नाटक करायचे ठरले. या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.

नाटकांच्या संशोधनाच्या निमित्ताने हृषीकेश जोशींना १०० वर्षांपूर्वीचे गडकरींचे हे नाटक सापडले आणि ते रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्‍चय केला. भक्त प्रल्हादाच्या चरित्रावर आधारित असलेले हे मूळ पाच अंकी नाटक असून त्याची जोशी यांनी दोन अंकी रंगावृत्ती केली आहे.

मूळ नाटकातील एकूण ९१ पदांपैकी फक्त १२-१३ पदांचा नाटकात समावेश करण्यात आला आहे. संगीत नाटक असल्याने अजय पूरकर, सावनी कुलकर्णी, सृजन दातार हे गायक नट नाटकात काम करतील. त्यांच्या साथीला अविनाश नारकर, मानसी जोशी, अंशुमन जोशी, शार्दुल सराफ यांचा अभिनय असेल.

हृषीकेश जोशी नाटकाचे दिग्दर्शक आहेत तर, नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →