एस.एल. भैरप्पा (२० जुलै, १९३४ - २४ सप्टेंबर, २०२५) हे लोकप्रिय कन्नड कादंबरीकार होते. त्यांच्या कादंबऱ्या मराठीसह अन्य भारतीय भाषांत अनुवादल्या गेल्या आहेत. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंडा’, ‘काठ’, ‘सार्थ’ या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना आकर्षित केले आहे. त्यांचे ‘सत्य आणि सौंदर्य’, ‘मी का लिहितो?’ यांसारखे वैचारिक ग्रंथ इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झाले आहेत. भैरप्पा यांना अभिजात भारतीय संगीत आवडते. त्यावरही त्यांनी कादंबरी रचली आहे.
भैरप्पा यांनी १३ वर्ष वयाचे असताना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. प्राथमिक शालेय शिक्षण गावीच पूर्ण केल्यावर ते म्हैसूरला पुढच्या शिक्षणासाठी जाण्यापूर्वी भावाच्या सांगण्यावरून शिक्षण सोडून देशभर भ्रमंती केली. मुंबईला रेल्वे पोर्टर म्हणून अल्प काळ काम केल्यावर ते काही साधूंबरोबर आध्यात्मिक शांतीच्या शोधार्थ बाहेर पडले. थोडे महिने त्यांच्याबरोबर फिरल्यानंतर ते म्हैसूरला आले व त्यांनी आपले शिक्षण पुन्हा सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयात डाॅक्टरेट मिळवली. हुबळी महाविद्यालय, गुजराथचे सरदार पटेल विद्यापीठ, दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन.सी.ई.आर.टी.) अशा संस्थांमध्ये भैरप्पांनी प्राध्यापकी केली, आणि शेवटी म्हैसूरमधील रीजनल काॅलेज ऑफ एज्युकेशनमधून १९९१ साली निवृत्ती घेतली. .
भैरप्पांनी सन १९५८पासून कादंबरी लेखनास आरंभ केला. १९६२ साली त्यांची वंशवृक्ष ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून पुढे ५०हून अधिक वर्षे ते लिहीतच राहिले. सर्वाधिक विक्री झालेल्या २२ गंभीर कादंबऱ्यांचे ते लोकप्रिय लेखक आहेत. 'आवरण' कादंबरीच्या चार वर्षात ३४ आवृत्त्या निघाल्या, हा भारतीय कादंबरी विश्वातला विक्रम समजला जातो.
१९८७ साली 'वंशवृक्ष'चा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. त्यानंतर भैरप्पांना मराठीतही लोकप्रिय कादंबरीकार म्हणून स्थान मिळाले. मराठीबरोबर डाॅ. एस.एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद हिंदी, संस्कृत, इंग्रजी आणि इतर बहुतांश भारतीय भाषांमध्ये झाले आहेत.
एस.एल. भैरप्पा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.