हिंदुस्थान देशाची फाळणी होण्यापूर्वी देशाच्या वायव्येला सिंध नावाचा प्रदेश होता. तो मुंबई इलाख्याचा भाग होता. साहजिकच सिंधमध्ये आणि विशेषतः त्यातल्या कराची शहरात अनेक मराठीभाषक होते. त्यावेळी अनेक सरकारी नोकरांच्या बदल्या सिंधमध्ये होत असत. फाळणीआधी कराचीत २५ हजार मराठी लोक रहात होते. बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रांत ते होते. कराचीत मराठी चित्रपट झळकत होते. सिंधी, पंजाबी, गुजराती, मराठी लोकसंस्कृतीचा प्रभाव कराचीवर होता. फाळणीआघी कराची मुंबई प्रांतातच प्रशासकीयदृष्ट्या जोडलेले होते. कोकण आणि पुण्यातून अनेक कुटुंबे कराचीत स्थलांतरित झाली होती. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्येही कराचीतील वास्तव्याचे खुमासदार वर्णन आहे.
कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली मराठी शाळाही सुरू झाली. इ.स. २०१३ सालीही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे, हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता. कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन कॉलेजात बोटीने येत असत. इ.स. १९६१ सालापर्यंत गोव्याहून सुटलेली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची आगबोट कोंकणातली व सौराष्ट्र-कच्छमधील बंदरे घेत कराचीला जात असे. फाळणीनंतर फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले. कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के ‘अन्यभाषिक’ म्हणून समजलेल्या गटात मराठी लोकही आहेत. तेथील महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सव मराठी पद्धतीने साजरा होतो. कराचीतल्या विविध देवळांत पुजारी म्हणून धार्मिक विधी करणारे, भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा करतात. ‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, कराचीतल्या या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील मराठी लोकही आवर्जून येतात. मंडप उभारला जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात, आरत्या म्हणतात, नाचतात. दीड दिवसाच्या गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जन केले जाते. आज २०१३ साली, कराचीतील मराठी लोकांनी अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे.
कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग आहे तो बेनेइस्रायलींचा. कराचीतील ६३० बेनेइस्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली. झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात.
फाळणीनंतर सिंध हा प्रदेश पाकिस्तानात गेला. तेव्हा मराठीजन आपली घरे मागे टाकून भारतात आले. त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला. सिंधमधील सिंधी भाषा बोलणारे लोक मात्र महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या पिंपरी आणि कल्याणजवळच्या अंबरनाथ या गांवी आले. पिंपरीजवळ सिंधी कॉलनी उभी राहिली आणि अंबरनाथजवळ उल्हासनगर.
सिंधी भाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.