२५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा होती. विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर, क्लिक-निक्सन अँड कंपनी या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वऱ्हाडवासीयांना आपलेसे केले. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोमठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, बोरी, लाडखेड, लिंगा, लासीना (जंक्शन) अशी १५ स्टेशने होती. ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही शकुंतला रेल्वे होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शकुंतला रेल्वे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.