वि.ग. कानिटकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विनायक गजानन कानिटकर (जन्म : २६ जानेवारी १९२६; - ३० ऑगस्ट २०१६) (टोपणनावे : ग्यानबा. रा. म. शास्त्री) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लिखाण केले. त्यांचा जागतिक राजकारणाचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.

कानिटकरांनी बीए (ऑनर्स), बी.एस्‌सी. ही पदवी घेऊन ३७ वर्षे अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच त्यांनी विविध नियतकालिकांतून लेखनास सुरुवात केली. मनातले चांदणे हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्‌मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या लेखमाला माणूसमध्ये प्रकाशित झाल्या. याशिवाय त्यांनी इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके लिहिली.

नाझी भस्मासुराचा उदयास्त ही लेखमाला प्रथम माणूसमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी रा.म. शास्त्री या टोपण नावाने ती लिहिली होती. मात्र, कानिटकर यांचे नाव वाचकांना पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीनंतर कळले. या पुस्तकाच्या सव्वीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

वि.ग. कानिटकरांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्यही मराठीत अनुवादित केले. त्यांनी मराठीतल्या १०० महत्त्वाच्या कादंबऱ्यांचे कथासार संक्षेपाने लिहिले आहे.

कानिटकर ललित मासिकात गप्पांगण या नावाचे सदर काही महिने लिहित होते. त्यांनी स्वाक्षरी नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. माणूसमध्ये वेगवेगळ्या टोपण नावांनी अनेक उपरोधिक सदरे त्यांनी लिहिली. त्यापैकी ग्यानबा या टोपण नावाने लिहिलेले मुक्ताफळे हे सदर (व पुस्तक) प्रसिद्ध झाले. आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी अनेक स्फुटे माणूसमध्ये लिहिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →