बाबूराव रामचंद्र घोलप (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९०४ - ) हे महाराष्ट्रातील ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या खासगी शिक्षण संस्थेचे संस्थापक होते.
वकिलीचा व्यवसाय करताकरता बाबूराव घोलप यांना शिक्षणाच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे कष्टाचे झाले आहे याचा अनुभव आला. इ.स. १९३३साली ते पुणे जिल्हा लोकल बोर्डात ‘चीफ ऑफिसर’ झाले. या ऑफिसच्या कामानिमित्त ते पुण्याच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या सर्व भागांत फिरले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांनी अनुभव घेतला.
बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी घोलपांनी ७ सप्टेंबर, १९४१ रोजी ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची सुरुवात ‘गावठी शाळा’ काढण्यापासून झाली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे श्री शिवाजी विद्यालयाची स्थापना करून त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणप्रसाराच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. ते स्वतः गावोगावी बैलगाडीने, सायकलीवरून, एस्टीच्या बसने आणि प्रसंगी पायी प्रवास करून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. बहुजन समाजातल्या मुलांसाठी त्यांनी शाळा काढल्या या शाळा देवळांत, गुरांच्या गोठ्यांत किंवा झाडाखाली भरत असत.
शिक्षणयोगी बाबूराव घोलपांची शिक्षणाबद्दलची तळमळ पाहून त्यांच्यासाठी गावोगावी मदतीचे हात पुढे आले. लोकांनी श्रमदानाने शाळांच्या इमारती बांधल्या.
बाबूराव घोलप
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?