डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches) महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे निर्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी लेखन साहित्याचे २२ खंड आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवली आणि याच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस" (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित हे वाल्युम (खंड) महत्त्वाचे असून यांची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या वृहत योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल, इ.स. १९७९ रोजी झाले.
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेसच्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून हिंदी भाषक जनता सुद्धा बाबासाहेबांच्या साहित्यापर्यंत पोहचू शकेल. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "बाबासाहेब डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत. हे हिंदी खंड सुद्धा लोकप्रिय ठरले असून आतापर्यंत याच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य मराठी भाषेत लिहिण्यासाठी १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली होती. विशेष कार्य अधिकारी म्हणून वसंत वामन मून यांची निवड केली. मून यांनी बाबासाहेबांच्या लेखनाचे, भाषणांचे देशविदेशातील संशोधन संकलित केले. त्यांच्या निधनापर्यंत १७ खंड प्रकाशित झाले. पुढील ५ खंड होतील एवढे साहित्य संपादित करून ठेवले होते. बाबासाहेबांचे विविध विषयांवरील समस्यांवर लेखन व भाषणांचे संकलन ग्रंथबद्ध करून खंडरूपात महाराष्ट्र शासनाकरवी प्रकाशित करून मून यांनी समोर आणले. विशेष असे की, बाबासाहेबांच्या इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यासंदर्भातील मंत्रिमंडळाचा निर्णय मून यांनी समितीवर असतानाच झाला होता. मात्र, मून यांचे निधन झाले. त्यानंतर आलेले सदस्य सचिव प्रा. हरी नरके, प्रा. दत्ता भगत, प्रा. अविनाश डोळस यांच्या कार्यकाळातही बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशन पूर्ण झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध विषयांवरील मूळ इंग्रजी साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केले. परंतु, (जानेवारी २०२१ पर्यंत) बाबासाहेबांच्या मूळ इंग्रजी साहित्य १ ते ६ खंडाच्या मराठी अनुवादाचा एकही ग्रंथ शासनाने प्रकाशित केला नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस सरकारने सुद्धा बाबासाहेबांच्या चरित्र साधने समितीमार्फत एकही खंड प्रकाशित केला नाही.
जुलै २०२१ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.