ज्योती बाबुराव लांजेवार (१९५० - ९ नोव्हेंबर, २०१३) या मराठी साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका, समीक्षक आणि विचारवंत होत्या. त्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या.
नागपूरच्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले. लांजेवार ह्या बहुभाषी होत्या, त्यांचे इंग्लिश, रशियन, जर्मन आणि स्वीडिश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झ्युरिक आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
लांजेवार कॉलेजमध्ये असताना कथाकथन, कवितांच्या स्पर्धेतही भाग घेत. नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या अनेक नाट्यछटा सादर झाल्या होत्या. त्यांनी ४० वर्षे लेखन केले होते. 'पुरुष लेखकांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीला न्याय दिला नाही’, असा आक्षेप नोंदवत आयुष्यभर आपल्या लेखणीतून स्त्रियांचे, विशेषतः दलित स्त्रियांचे विविध पैलू, समस्या ज्योती लांजेवार यांनी अधोरेखित केल्या. लांजेवार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणांमधूनच त्या रिपब्लिकन पक्षाचे कार्य करु लागल्या. चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी योगदान दिले.
९ नोव्हेंबर, २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
ज्योती लांजेवार
यामागील विज्ञान आणि इतिहास.