कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे.
श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.
कारगील युद्धात भारताच्या बोफोर्ससहित ३०० तोफांचा वापर झाला. अडीच लाख तोफगोळे, बॉंब आणि ऱाॅकेट्स डागले. रोज ३०० तोफांमधून ५००० गोळे, माॅर्टर बॉंब आणि राॅकेट्स डागले जात होते. शत्रूचे ८०% सैनिक मारले गेले. एकट्या टायगर हिलवर ताबा मिळविण्यासाठी ९,००० तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य ४० वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी १८ तोफा २५ दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले.
लढाईआधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.
कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.
कारगिल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.