अशोक शहाणे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अशोक पुरुषोत्तम शहाणे (जन्म - ७ फेब्रुवारी १९३५) हे मराठी भाषेतील एक लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक, व प्रकाशक आहेत.

अशोक शहाणे यांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. ते पुण्याला येऊन एस.एस.सी. झाले. पुढे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजातून (एम्‌ईएस-आताचे गरवारे कॉलेज) बी.ए.झाले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी साधना, रहस्यरंजन इत्यादी नियतकालिकांतून लेखन केले. रहस्यरंजनचे काही काळ संपादनही केले.. पुण्यात असताना त्यांनी बंगाली भाषेचा अभ्यास केला.

त्यानंतर अशोक शहाणे हे १९५८-६० च्या सुमाराला आकार घेऊ लागलेल्या अनियतकालिकांच्या वाङ्मयीन चळवळीत सक्रिय झाले. त्यांनी प्रस्थापित लेखक, प्रकाशक, संपादक यांवर हल्ला चढवणारा ‘मराठी वाङ्मयावर क्ष-किरण’ हा लेख खळबळजनक ठरला. तेव्हापासून अशोक शहाणे हे अनियतकालिकांच्या चळवळीतले अध्वर्यू मानले जाऊ लागले. त्यांनी त्यानंतर 'तीस वर्षांची पुस्तकी हालहवाल' हे लेख लिहून अशीच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'आज दिनांक', 'महानगर' आणि 'साप्ताहिक सकाळ'मध्ये अल्पकाळ केलेले सदर लेखनही असेच चर्चेचा विषय झाले होते.

शहाणे यांनी एकोणीसशे साठच्या दशकात मुंबईहून ‘अथर्व’ (१९६१) व ‘असो’ (१९६४) अशी दोन अनियतकालिके सुरू केली. अथर्व पहिल्या अंकानंतर बंद पडले, तर ‘असो’चे १६ अंक निघाले. १९७६ साली त्यांनी पुण्याला प्रास प्रकाशन संस्थेची स्थापना केली. शहाणे बंगाली भाषेचे उत्तम जाणकार असल्याने त्यांनी शीर्षेंदू मुखोपाध्याय, मोती नंदी, समरेश बसू, श्यामल गंगोपाध्याय, रमानाथ राय अशा अनेक मोठ्या लेखकांच्या कथांचे मराठी अनुवाद केले.

अशोक शहाणे यांनी दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी आणि त्यांच्या चमूला बंगाली नाटककार अजितेश बंद्योपाध्याय यांचे महाभारताच्या शेवटच्या पर्वावरील 'हे समय उत्तान समय' हे मूळ बंगाली नाटक वाचून दाखवले, तेव्हा त्यांच्या हातात बंगाली पुस्तक होते अन्‌ ते वाचत होते मराठीत, आणि ते वाचन अतिशय सुगम आणि अस्खलित होते, याची आठवण रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी अजूनही सांगतात.

अशोक शहाणे यांनी 'प्रास प्रकाशन' या संस्‍थेमार्फत अनेक चांगली पुस्तके काढली. अरुण कोलटकरांची मराठी-इंग्रजी पुस्तके काढली. पुस्तकांच्या रूढ होऊ पाहणाऱ्या साचेबद्ध आकारांना सुरूंग लावण्याचे काम केले. पुस्तक तर काढायचे आहे; पण त्यासाठी पैसे नाहीत, या विवंचनेतून त्यांनी पुस्तकांच्या आकारात, मांडणी, सजावटीमध्ये जे बदल केले आहेत, ते मराठी वाचकांना चांगलेच माहित आहेत.

कवी अरुण कोलटकर यांनी तुकोबांच्या अभंगांविषयी संशोधन केले होते. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या तुकोबांच्या गाथेतले काही अभंग त्यांचे नाहीत आणि तुकोबांचे म्हणून असलेल्या बऱ्याच अभंगांचाही त्यात समावेश नाही. अशा एकूण जवळपास नऊ हजार अभंगांचा शोध अरुण कोलटकरांनी घेतला होता. हे संशोधन अशोक शहाणे पुस्तकरूपात प्रसिद्ध करणार आहेत.

प्रसिद्ध कॅलिग्राफी तज्ज्ञ र.कृ. जोशी यांच्या मराठी अंकलिपीचे पुस्तक, वसंत गुर्जर यांच्या कविता, सिनेदिग्दर्शक अरुण खोपकरांचे पुस्तक, नुकतेच दिवंगत झालेल्या रघू दंडवते यांची एक कादंबरी आणि कवितासंग्रह, 'असो' आणि 'वाचा'मधील सर्व लेखनाचे स्वतंत्र पुस्तक अशा योजना त्यांच्या हाताशी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →