सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.
विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे २३.५° अंशांमधील म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यातील प्रदेशाला उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात. आपला भारत देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. इथे वर्षभर सूर्य तळपतो त्यामुळे सौर ऊर्जा बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारांमध्ये नेमाने करत नसल्याने तिला अपारंपरिक ऊर्जा म्हणतात. असे असले तरी,
सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी फोटोव्होल्टेइक सिस्टिम, केंद्रीकृत सौर ऊर्जा आणि सौर वॉटर हीटरचा वापर होतो.
सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो. पण जास्त काळ टिकतो आणि तिचा दुरुस्ती खर्च कमी असतो.
सोलर मिशन अंतर्गत २०२२ पर्यंत २०,००० मेगावॅट वीज उत्पन्न व्हावी असा उद्देश आहे. सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी योजना आखताना सर्वप्रथम तिची उपलधता कुठे आणि किती आहे हे विचारात घ्यावे लागते. भारतातील वेधशाळांत अनेक दशकांपासून सूर्यप्रकाशाचा अवधी, सौर विकरण आणि दिशा यांच्या नोंदी केल्या गेल्या आहेत. त्यांचे विश्लेषण करून सौर प्रकल्पासाठी जागा ठरवली जाते.
महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे. सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊजचा वापर करणारे वीज निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. नागपूर, चंद्रपूर, लातूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, पुणे या जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४०० मेगावॅट असली तर ती २०२० पर्यंत ती ७,५०० मेगावॅट इतकी वाढवायची योजना आहे.
आंतरराष्ट्रीय मानक संघटनेने सौर ऊर्जा उपकरणासंबंधित अनेक मानके ठरवली आहेत. उदाहरणार्थ, आयएसओ क्र. ९०५० हे इमारतींमध्ये काचेच्या भिंतींसंबंधित आहे तर आयएसओ क्र. १०२१७ सोलर वॉटर हीटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीशी संबंधित आहे.
सौर ऊर्जा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?