सेतुमाधव पगडी (२७ ऑगस्ट, १९१०; - १४ ऑक्टोबर १९९४) हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, सेतुमाधव पगडी यांनी विपुल प्रमाणात स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला.
मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अश्या जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“, “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधव पगडींनी भूषविले आहे.
सेतुमाधव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९ पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.
गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
सेतुमाधव पगडी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.