शेख अब्दुल्ला

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शेख अब्दुल्ला

शेख मोहम्मद अब्दुल्ला (उर्दू: شیخ محمد عبد اللہ; ५ डिसेंबर १९०५ - ८ सप्टेंबर १९८२) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे नेते होते. शेख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्थापना केली व भारताच्या स्वातंत्र्यावेळी महाराजा हरी सिंग ह्यांच्या धोरणांना विरोध केला. १९४८ सालच्या काश्मीरच्या भारतामधील विलीनीकरणानंतर १९४८ साली ते जम्मू काश्मीर राज्याचे पंतप्रधान (वझीर-ए-आझम) बनले. १९५३ साली तत्कालीन राज्यपाल करण सिंग ह्यांनी शेख अब्दुल्लांना पंतप्रधानपदावरून बरखास्त केले व शेख अब्दुल्लांना अटकेत टाकले गेले. आपल्या आत्मचरित्रामध्ये अब्दुल्लांनी अटकेसाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरले आहे.

११ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १९६४ साली अब्दुल्लांची सुटका झाली. परंतु अब्दुल्लांनी काश्मीरला भारतापासून अलग करण्याचे प्रयत्न चालू ठेवल्यामुळे १९७१ साली त्यांची १८ महिन्यांकरिता काश्मीरमधून हकालपट्टी करण्यात आली. १९७४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी व शेख अब्दुल्लांदरम्यान झालेल्या वाटाघाटींनतंतर अब्दुल्लांनी स्वतंत्र काश्मीरचा आग्रह सोडला. २५ फेब्रुवारी १९७५ रोजी त्यांना पुन्हा जम्मू काश्मीर राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. ते ह्या पदावर ८ सप्टेंबर १९८२ मधील त्यांच्या मृत्यूपर्यंत होते.

शेख अब्दुल्ला ह्यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला व नातू ओमर अब्दुल्ला हे दोघेही जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →