विरामचिन्हे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लिखित स्वरूपातील काहीही वाचताना कुठे थांबायचे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे समजावे ह्यासाठी भाषेत विरामचिन्हांचा वापर होतो.

मध्ययुगीन मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती. तसेच संस्कृत भाषा देवनागरी लिपीत लिहिताना केवळ दंड (।) या व्याकरण चिन्हाचा वापर केला जाई. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे विरामचिन्हांचा वापर लोकमान्य आणि रूढ झाला. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विरामचिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.

बोलली जाणारी कोणतीच भाषा अशुद्ध नसते. भाषा लेखनाला मात्र काही वैश्विक परिमाणे असतात. थोड्याशा सजगतेने वाचन केले तर ती लक्षात येतात. नियम पाठच करायला हवेत असे नाही.

आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे कळते. ते लिहिताना मात्र प्रमाणलेखनात असणे अपेक्षित आहे. कारण वाचणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असतेच असे नाही. शिवाय प्रमाणलेखन भाषेचे/लिपीचे सौंदर्य वाढवत असते. वाचताना कुठे व किती वेळ थांबायचे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळाव्यात यासाठीही ते आवश्यक ठरते.

भाषाभाषांत थोड्याफार फरकाने विरामचिन्हांचे नियम सारखेच असतात. लेखन करतांना दोन शब्दांमध्ये व वाक्यांमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. मात्र मराठीसाठी आंग्लभाषेतून स्वीकारलेली व्याकरण चिन्हे लिहिताना ती शब्दास जोडून लिहिली जावीत.

एखाद्याचे उद्गार लिहिताना मात्र ते दुहेरी अवतरण चिन्हात जसेच्या तसे लिहिले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →