लक्ष्मीकांत देशमुख (जन्म: ५ सप्टेंबर १९५४) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती)
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.
लक्ष्मीकांत देशमुख
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.