महाराष्ट्रातील विद्यापीठे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ इ.स. १९२३ मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ इ.स. १९४८ आणि मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९५६ मध्ये स्थापन झाले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन राज्य कृषि मंत्रालयामार्फत होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतवैद्यक, रुग्ण शुश्रूषा विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. रायगड जिल्ह्यात लोणेरे येथे डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, तसेच नागपूर येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.

या व्यतिरिक्त, मराठी भाषा विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →