परडी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणि कवड्याची माळ यासोबत परडीला महत्त्व आहे. ही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आई भवानीच्या दरबारात परडीचे एक वेगळेच महत्त्व आहे. परडी आणि परसराम अशा जोडी भिक्षापात्र म्हणून प्रसिद्ध आहेत. परडी म्हणजे ताट आणि परसराम म्हणजे वाटी. परडी बारीक वीण करून बनविली जाते. परडी हे रोग दूर करण्याचे साधन मानले जायचे. हळद-कुंकू, लिंबू आणि प्रसाद घातलेली परडी एका गावातून दुसऱ्या गावात नेली जायची. अखेर ती समुद्रात विसर्जित केली जात असे. यामुळे साथरोग नाहीसे होतात, असा समज होता. आजही असाध्य आजारासाठी परडीचा उपाय शोधणारे अनेकजण आहेत. रोगाची साथ घालविण्यासाठी परडी विधी केला जात असल्याचा उल्लेख भारतीय संस्कृतिकोशात आढळतो.

परडी भरणे हा पूजाविधी आहे. परडी-कवड्यांची माळ घेऊन जोगवा मागणारे भक्त सर्व स्तरांतील आहेत. घरात जो पदार्थ असेल त्याचा नैवेद्य हे तुळजापूरच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दररोज भवानीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्या भागात जे पिकते तेच देवतांच्या नैवेद्याचा भाग असते. अशा कोणत्याही पदार्थाने परडी भरता येते.असा नैवेद्य घेऊन जाणे जसजसे अवघड होऊन गेले तसतसे शिधा सुरू झाला. त्यातही मीठ-पीठाचे महत्त्व वाढत गेले. गावोगावच्या महिला परड्या भरतात. मंदिरातील होमकुंडात हजारो लोक नवस म्हणून पीठा-मिठाच्या परड्या भरतात.

वेळूची परडी ही मातृदैवतांना आवडीची असल्याची आणि गर्वहरणाचे प्रतीक असल्याचा उल्लेख उपासक करतात. तुळजापूरातील पूजाऱ्यांच्या घरातील परडी वेगळी आहे.ताटातील मोठी वाटी किंवा वाडगे असा त्याचा आकार असून तुळजापूरातील काळभैरव मूर्तीच्या हातातदेखील अशाच प्रकारचे पात्र आहे. एखाद्याच्या घरात मृत्यू झाला तर सुतकानंतर परडी बदलली जाते. अगदी प्राचीन काळापासून भारतीय लोकजीवनात परडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

परडी प्रथा असणाऱ्या प्रमुख दैवता

१. श्री रेणुका (यल्लमा) - परडीची मूळ उत्पत्ती ही कृतयुगात रेणुका अवतारातच झालेली आहे. आक्कव्वा - जोगव्व्वा या थोर मुनींनी रेणुकेला तिच्या पतीच्या अर्थात ऋषी जमदग्नी यांच्या श्रापातून मुक्त केल्याप्रित्यर्थ त्यांच्या नावाने रेणुकेने प्रथम जोगवा मागितला. रेणुका देवीच्या परडी साधनेत परडीपात्र, परशुरामपात्र, कवडीमाळ आणि देवीचा काकडा जसा तुळजाभवानीचा पोत असतो; अगदी त्याचप्रमाणे रेणुकेच्या परडीत लहानसा काकडा असतो जो सहसा जागरण गोंधळ या कार्यक्रमात पोताप्रमाणे प्रज्वलित करून हातात घेऊन नाचवला जातो. माहूरच्या रेणुकेच्या परडीला मीठा-पीठाचा मान आहे; परंतु सौंदत्तीच्या यल्लमा देवीच्या परडीला मीठा-पीठासोबतच भाजी-भाकरी, कांद्याची पात, पुरणाचे कडबू अशा विविध पदार्थांनी आपापल्या कुलाचाराप्रमाणे मान पान केला जातो.

२. श्री यमाई देवी - शिवशक्तीस्वरूपिणी यमाई देवीला पार्वती व रेणुका देवीचा संयुक्त अवतार मानले जाते. यमाई देवीची महाराष्ट्रात प्रमुख बारा पीठे असून साताऱ्यातील औंध गावी यमाईचे मुळपीठ आहे. औंध प्रमाणेच राशीन, मार्डी, वाडी रत्‍नागिरी (जोतिबा डोंगर), महाळुंग, कन्हेरसर आणि शिवरी या तीर्थस्थानांवर देखील यमाई देवीच्या परडीस अनन्यसाधारण महत्व आहे. संसाराचे सार मानल्या जाणाऱ्या मीठापीठाने देवीच्या परड्या भरल्या जातात. यमाई देवीच्या परडी साधनेत परडीपात्र, परशुरामपात्र आणि कवडीमाळ यांचा समावेश असतो.

३. श्री तुळजाभवानी - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या परडीचा प्रसार प्रचंड आहे. तिच्या भक्ती साधनेत परडीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या परडीस देखील मीठा-पीठाचाच मान आहे. तुकाई अर्थात तुळजाभवानी देवीच्या परडी साधनेत परडीपात्र, परशुरामपात्र, पोत आणि कवडीमाळ यांचा समावेश असतो. आजही तुळजापूरमध्ये अनेक कुटुंब आपापल्या कुलाचाराप्रमाणे तुळजाभवानीच्या परडीची मनोभावे सेवा करताना दिसतात.

४. श्री येडेश्वरी (येडाई) देवी - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेली येरमाळयाची येडेश्वरी म्हणजेच येडाई देवीच्या भक्तिसाधनेत तुळजाभवानी प्रमाणेच परडी प्रथा पूर्वापारपासून सुरू आहे. येडेश्वरी देवीच्या परडीस भवानीप्रमाणेच मीठा-पीठाचाच मान आहे. येडाई अर्थात येडेश्वरी देवीच्या परडी साधनेत परडीपात्र, परशुरामपात्र आणि कवडीमाळ यांचा समावेश असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →