कॉम्रेड शरद तानाजी पाटील (जन्म : १७ सप्टेंबर १९२५, - १२ एप्रिल २०१४)
प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारिक मांडणी करणारे, जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत.
धुळे तालुक्यातील कापडणे हे पाटील यांचे मूळ गाव. मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचे धुळे येथे निधन झाले.
"मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद विश्लेषण पद्धती", त्यातूनच विकसित झालेली "सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धती" आणि "वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद", असे तीन मुख्य सिद्धांत हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप सांगता येईल.
भारतीय समाजाचे विश्लेषण करणे व उपाय सुचविणे यासाठी केवळ मार्क्सवाद अथवा फुलेवाद किंवा आंबेडकरवाद पुरेसा नाही. भारतीय समाजवास्तव इतके भीषण आहे की या तिन्हींचा मेळ घालून काहीएक नवी विश्लेषण पद्धती रचली तरच भारतीय वास्तवाचे अस्सल भान येऊ शकेल, हे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे "दार्शनिक सत्य आणि भौतिक मुक्ती कधी चिरस्थायी, त्रिकालाबाधित नसते. कालचे सत्य आजचे असत्य बनून (त्या) अस्थिर सत्याला अधिक दुर्बोध करते. कालची मुक्ती आजची गुलामगिरी बनून (त्या) अस्थिर मुक्तीला आणखी अस्थिर करते" असे त्यांचे प्रतिपादन होते.
कॉम्रेड शरद पाटील हे मुळात कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) या पक्षाचे धुळे जिल्ह्याचे संघटक होते. ब्राह्मणेतर चळवळीशी संबद्ध असलेल्या घराण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या शरद पाटलांना त्या चळवळीची व्याप्ती जातीय समतेपुरतीच सीमित असल्याचे वाटल्याने पाटील समतेसाठी व्यापक वर्गलढा उभारणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाकडे आकृष्ट झाले. पण तेथे वर्गविषमतेवर अधिक भर दिला जाऊन जातीय विषमतेकडे दुर्लक्ष होते, असा अनुभव आल्यावर ते साम्यवादी चळवळीत जातिअंताची भाषा बोलू लागले. दरम्यान, त्यांना स्त्री-पुरुष, म्हणजेच लिंगविषमतेच्या समस्येचीही जाणीव होऊन त्यांनी वर्ग आणि जाती यांच्या अंताबरोबरच स्त्रीदास्यंताची चळवळही व्हायला हवी असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना मार्क्सवाद्यांनी केलेल्या आदिम समाजाच्या विश्लेषणाला आव्हान द्यावे लागले. पण मार्क्सवादी विज्ञानाच्या चौकटीत जातीच्या आणि लिंगविषमतेच्या भाषेला थारा नाही, हे लक्षात आल्याने पाटील मार्क्सवाद्यांवर वर्गांधळेपणाचा आरोप करीत, त्यासाठी त्यांनी मार्क्सवादाचा तत्त्वज्ञानात्मक विकास करून बहुप्रवाही, विधायक, अब्राम्हणी ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण (विश्लेषण) सिद्ध केले. कारण मार्क्सवादाची मर्यादा, केवळ वर्गकलहच क्रांतिकारक मार्गाने सोडवला पाहिजे, जातिभेद - स्त्रीदास्य हे संघर्ष क्रांतिकारक मार्गाने सोडविण्याची आवश्यकता नाही - याला आव्हान देत भारतीय परिप्रेक्षात जातिव्यवस्था ही विषम उत्पादन संस्था असल्याचे त्यांनी पुढे आणले. यातून एकप्रवाही मार्क्सवादी अन्वेषण बहुप्रवाही बनले. क्रांतिकारी संघर्षात स्त्रीदास्यान्ताला प्राधान्य देऊन ते अन्वेषण अब्राम्हणी बनविले. नवसमाजनिर्मितीसाठी ते इतिहासातील प्रस्थापित संकल्पनांचे ऐतिहासिक योगदान मांडत त्यांच्या कालबाह्यतेला नकार उभा करत आले, त्यातून ते विधायक बनले. बहुप्रवाही, अब्राम्हणी, विधायक ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण हा त्यांनी मार्क्सवादाच्या व्यवहारी तत्त्वज्ञानाचा भारतीय परिप्रेक्षात केलेला विकास होय.(म्हणजे काय??)
जातीच्या प्रश्नावर क्रांतिकारक लढा उभा करण्यास मार्क्सवाद्यांचा सातत्याने नकार मिळत राहिला. त्याची परिणती कम्युनिस्ट पक्ष सोडण्यात झाली. त्यानंतर शरद पाटलांनी इ.स. १९७८साली, जातवर्गस्त्रीदास्यान्तक, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाची धोरणे कार्ल मार्क्स, जोतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसणीवर आधारित आहेत.
अशी विचारसरणी असलेल्या शरद पाटील, यांनी स्वैराचारी म्हणून बदनाम ठरलेल्या शाक्त तंत्राकडे अब्राम्हणी, विधायक इतिहासलेखनशास्त्राच्या दृष्टीने पाहून, शाक्त तंत्र हे जाती आणि स्त्रीदास्य यांचा अंत घडवून आणणारा विज्ञानपूर्व मार्ग होता, हे पुढे आणले. ब्राम्हणी शाक्त प्रवाहाच्या उपासनेत मद्यमांसमैथुनादी पंच मकारांवर भर दिला जातो. अब्राम्हणी शाक्त प्रवाहाच्या परंपरेत पंचमकार हा मुक्तीचा मार्ग या अर्थाने स्वीकारला गेला होता, हे ऐतिहासिक सत्य पुढे आणले. त्यामुळे, शरद पाटलांना हे एक जातिमुक्त समाजासाठीच क्रांतिकारक पाऊल वाटले.
जातिभेद आणि लिंगभेद यामुळे निर्माण झालेल्या दास्याचा अंत घडवून आणण्याची कॉ. पाटलांची प्रेरणा अस्सल होती व तळमळही पराकोटीची होती, यात शंका नाही. त्यासाठी त्यांनी शाक्त तंत्राच्या अब्राम्हणी प्रवाहाचे जात्यंतक रूप पुढे आणले. दास-शूद्रांची गुलामगिरी या द्विखंडी अभिजात ग्रंथाद्वारे त्यांनी इतिहासपूर्व काळातील दास-शूद्रांच्या गुलामगिरीचा मूलभूत प्रश्न सर्व इतिहासकारांच्या विरोधात जाऊन पुढे आणला. प्राथमिक साम्यवादाच्या कम्युनिस्टांच्या गंधर्वनगरीला अनैतिहासिक ठरविले. मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक समाजांचा इतिहास सर्वप्रथम साधार मांडला.
कॉम्रेड शरद पाटील
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?