शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व (एप्रिल ८, १९२४;सुळेभावी-बेळगाव - जानेवारी १२, १९९२;देवास) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.
कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरूकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.
अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी इ.स.१९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. १९४७ साली त्यांचे मराठी गायिका भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले. भानुमती कोमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले. इ.स. १९५५ साली त्यांना मुकुल शिवपुत्र नावाचा मुलगा झाला, पुढे चालून तो देखील गायक बनला. इ.स. १९६१ मध्ये भानुमती वारल्या आणि कुमारांनी १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले.
कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वतः बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांनी सादर केले. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे.
कुमार गंधर्व हे शेवटपर्यंत नवी मुंबई येथील वाशीतल्या पं. विष्णू दिगंबर स्मारक योजनेचे अध्यक्ष होते.
त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.
कुमार गंधर्व
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!