कमर जलालाबादी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कमर जलालाबादी (२९ फेब्रुवारी, १९१७:जलालाबाद, पंजाब - ९ जानेवारी, २००३:मुंबई, महाराष्ट्र) हे हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहिणारे हिंदी-उर्दू गीतकार होते. अमृतसरपासून पासून १७६ किलोमीटर दूर असलेल्या जलालाबाद नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव ओम प्रकाश आणि वडिलांचे नाव लाला हरजस राय होते. हे भंडारी खत्री पंजाबी होते. इंग्रजी राजवटीत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. ते जलालाबाद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.

ओम प्रकाश याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तरी त्याने कसेबसे करून उर्दू शाळेत दहा इयत्ता पास केल्या. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना शायरीमध्ये रस निर्माण झाला, आणि काही वर्षांत त्यांचे लेखनही सुरू झाले. गावातीलच एका 'अमर' नावाचा एका माणसाला ओम प्रकाशच्या ह्या लिखाणाचे कौतुक वाटे. त्यांनी या मुलाला प्रोत्साहन देऊन पुढचा मार्ग दाखवला. ओम प्रकाशची शायरी वाचून 'अमर' ह्यांनी तो मोठा कवी होईल असे भाकीत केले आणि त्याला स्वतःसाठी चांगले टोपणनाव निवडायला सांगितले. ओम प्रकाशने 'अमर'शी मिळते जुळते क़मर हे नाव घेऊन त्याला जलालाबादी हे गावाचे नाव जोडले, आणि ओम प्रकाश भंडारीचा 'क़मर जलालाबादी' झाला. नवीन नाव घेतले आणि त्यांनी उठताबसता, बिछान्यावर पडल्यापडल्या शायरी लिहायला सुरुवात केली. उर्दूमध्ये क़मर म्हणजे चंद्र. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'रश्क़े-क़मर' या नावाने प्रकाशित झाला. (त्यानंतर अनेक वर्षांनी एका कवीने 'रश्क़े-क़मर' हे नाव घेऊन कविता लिहिल्या!) (उर्दूत रश्क़ म्हणजे ईर्षा, हेवा).

सन १९३५मध्ये क़मर जलालाबादी यांनी रोज़नामा प्रताप नावाच्या उर्दू वर्तमानपत्रात नोकरी सुरू केली. तेथून निघाल्यावर 'मिलाप' नावाच्या वर्तमानपत्रात लागले. काही वर्षातच ते 'निराला' नावाच्या मासिकाचे संपादक झाले. पुढल्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटात कथा-संवाद-गीते लिहायला सुरुवात केली. पण इतके असले तरी त्यांना देवनागरीचा 'द'ही येत नव्हता.

याच कार्यकालात क़मर जलालाबादी 'स्टार शाहकार' नावाच्या पत्रिकेचे संपादक झाले. या पत्रिकेचे खूप नाव झाले. त्याकाळी प्रतिष्ठित सज्जनांच्या पंक्तीत पाय रोवायच्या प्रयत्नात असलेले कवी साहिर लुधियानवी, आणि क़तील शिफ़ाई यांनीही क़मर जलालाबादी यांना मोठेपणा दिला. त्यांनी क़मर यांना पुरेपूर मदत केली. साहिर लुधियानवी यांनी तर आपल्या काॅलेजातल्या कविसंमेलनासाठी क़मर जलालाबादी यांना लाहोरहून लुधियानाला बोलावून घेतले होते.

याच दिवसांमध्ये 'चचा छक्कन' आणि 'अनारकली'चे प्रसिद्ध लेखक सैय्यद इम्तियाज़ अली 'ताज' यांच्या मार्फत क़मर हे लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पंचोलींपर्यंत पोचले आणि त्यांनी पंचोली पिक्चर्सच्या चित्रपटात गीतकाराचे काम मिळवले. पंचोली पिक्चर्सच्या सन १९४२मध्ये निघालेल्या ज़मींदार या चित्रपटात क़मर जलालाबादी यांनी लिहिलेले पहिले चित्रपट गीत 'दुनिया में गरीबों को आराम नहीं मिलता, रोते हैं तो हॅंसने का पैग़ाम नहीं मिलता' जबरदस्त हिट झाले. या गीताला ग़ुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केले होते. शमशाद बेगम गायिका होत्या. या गीताच्या शेवटच्या दोन ओळी - जो कोई भी आता है ठोकर ही लगाता है, मर के भी गरीबों को आराम नहीं मिलता - या तत्कालीन प्रसिद्ध शायर बहज़ाद लखनवी यांनी सुचवल्या होत्या, म्हणून चित्रपटाच्या श्रेयनामावलीत गीतकार म्हणून त्यांचेही नाव आहे.

१९४४ साली त्यांनी पुण्यातील प्रभात चित्रपट संस्थेशी संधान बांधले आणि चॉंद चित्रपटाच्या गीतलेखनाबरोबर त्याचे संवादलेखनही केले. प्रभातच्या चार चित्रपटांचे गीतलेखन केल्यानंतर क़मर जलालाबादी मुंबईला आले. आणि मुंबईचेच होऊन राहिले. पुढची जवळजवळ ५० वर्षे ते चित्रपटांचे गीतलेखन करत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →