ए‍म.जी. रामचंद्रन

या विषयातील रहस्ये उलगडा.

ए‍म.जी. रामचंद्रन

मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, (तमिळ: ம. கோ. இராமச்சந்திரன் ; रोमन लिपी: Maruthur Gopalan Ramachandran) (जानेवारी १७, इ.स. १९१७; नवलपिटिया, ब्रिटिश सिलोन - डिसेंबर २४, इ.स. १९८७; चेन्नई, तमिळनाडू, भारत) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री होते.

तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. इ.स. १९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. इ.स. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दरम्यान द्रविड मुन्नेट्र कळघम पक्षाचे ते सदस्य झाले. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. इ.स. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम पक्ष स्थापला. इ.स. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. इ.स. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते.

एम.जी. रामचंद्रन यांना मरणोत्तर भारतरत्‍न पुरस्काराने गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →