समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन!
आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे. प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते. आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद, केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्य.
आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे. कायद्याचे पदवीधर मुरलीधर देविदास आमटे. सुखवस्तू कुटुंबातील. त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही. नियतीने त्यांची वाट वेगळीच ठरविली होती. समाजाने आणि परिवाराने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरुग्णांवर त्यांची दृष्टी पडली. त्यांना जीवनाचे ध्येय सापडले. जगण्याचा मार्ग मिळाला. सुखकर आयुष्य सोडून ते १९४९ मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली.
त्या वेळी त्यांच्या पाठीशी पत्नी साधनाताई उभ्या होत्या. साधनाताईही सुखवस्तू कुटुंबातील; परंतु त्यांनी समाजाची चिंता वाहणारा, त्यांची आसवे टिपणारा फकीर, जोडीदार म्हणून निवडला. प्रारंभीच्या दिवसांत आनंदवन म्हणजे साप, विंचू यांचे घर होते. सर्वत्र दलदल. सोबत काळोख. अशा ठिकाणी बाबा आणि साधनाताई वास्तव्याला आले. अनेक कठीण प्रसंग आलेत; मात्र बाबा आणि ताई ध्येयापासून दूर गेले नाहीत. अशा वेळी त्यांच्यासमोर रक्ताच्या नात्यांनी, समाजाने बहिष्कृत केलेली माणसे दिसायची. त्यांच्या डोळ्यांतील आसवे दिसायची. त्यांच्या दुःखात स्वतःला सामावून घेताना बाबा आणि ताईंना सुख मिळायचे. कालांतराने हजारो माणसे जुळत गेली. आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले. मात्र, आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे. प्रत्यक्षात अंध-अपंग, कर्णबधिर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे.
आनंदवन
थोडक्यात पण महत्त्वाचे.