आणीबाणी (भारत)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले, प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती देण्यात आली, विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली, रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. एकप्रकारे आणीबाणी मुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यात आली. अशा कठीण प्रसंगी, लेखक बशीर मोमीन (कवठेकर) यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रंगमंचावर सादर केले. 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात, छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य टिकवण्यासाठी कशा प्रकारे दिल्लीच्या आक्रमणाला शौर्याने तोंड दिले हे दर्शवले आहे. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कलीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले.

जनता हळूहळू आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. समाजवादी पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात मृणाल गोरे,पन्नालाल सुराणा,प्रभूभाई संघवी, यांनी मोठे योगदान दिले.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →