सैनिकी शाळा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सैनिकी शाळा म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (पुणे) व भारतीय नाविक अकादमी (विशाखापटनम्) यांच्या प्रवेशार्थ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी विद्यालये. या विद्यालयांचा मूळ उद्देश युवकांना शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. देहरादून येथे १९२१ मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी आणि इंग्लंडमधील पब्लिक स्कूलच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या संरक्षण विभागामार्फत प्रत्येक राज्यात एकेक सैनिकी शाळा स्थापन करण्याचे धोरण १९६१ मध्ये अवलंबिण्यात आले. त्यानुसार सुरुवातीस पाच सैनिकी शाळा देशात स्थापण्यात आल्या. त्यांपैकी पहिली सैनिकी शाळा महाराष्ट्रातील सातारा येथे जून १९६१ मध्ये स्थापन करण्यात आली. अशा प्रकारच्या एकूण २४ सैनिकी शाळा भारतातील विविध राज्यांतून २००८ मध्ये कार्यरत होत्या. त्यांतून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. शैक्षणिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असून पब्लिक स्कूलप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना सैनिकी व शालेय शिक्षण दिले जाते. या सर्व शाळा निवासी विद्यालये असून केंद्र शासनाद्वारे त्या चालविल्या जातात व त्यांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केलेली असते. २००८ मध्ये प्रत्येक सैनिकी शाळेसाठी दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली होती. या शाळांवर राज्य शासन व संरक्षण मंत्रालय यांचे नियंत्रण असून नऊ ते सतरा वयोगटातील हुशार युवकांना राष्ट्रीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. संरक्षण दलात सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांसाठी काही जागा आरक्षित असून शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलांना काही सवलती दिल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →