सआदत हसन मंटो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सआदत हसन मंटो

सआदत हसन मंटो (जन्म : समराला-लुधियाना, ११ मे १९१२; - लाहोर, १८ जानेवारी १९५५) हे एक हे एक संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक होते. त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. त्यांच्या आयुष्यातील भळाळती जखम म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी. दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने व्यथित केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातील घटनांचे सत्य आणि विद्रूप त्यांनी निर्भीडपणे मांडले. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्ऱ्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी व इतर फुटकळ साहित्य लिहिले. मंटो याच्या टोबा टेकसिंह या कथेवर एक चित्रपट निर्माणाधीन आहे. (२००९ साल)

मंटो यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील समराला इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर इथे झाले. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी व्हिक्टर ह्युगो यांच्या The Last Days of a Condemned Man या कादंबरीच्या अनुवादाने केली. या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर व्हिक्टर ह्यूगो, मॅक्झिम गॉर्की, आंतोन चेखव, इत्यादी फ्रेंच व रशियन लेखकांचा प्रभाव होता.

भारताच्या फाळणीनंतर मंटो जानेवारीमध्ये मुंबई सोडून लाहोरला गेले. मंटोच्या आयुष्याची अंतिम वर्षे त्यांच्यासाठी आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने हलाखीची होती, परंतु त्यांचे सर्वोत्कृष्ट लिखाण याच काळात झाले. मंटो यांचा मृत्यू १८ जानेवारी १९५५ रोजी लाहोर इथे झाला.

मंटो या लेखकाचे नाव जितके विचित्र, तितकाच तो माणूसही विचित्र होता. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखाऱ्यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. मंटोच्या साहित्यात हेच झालेले दिसते. मंटोचा आयुष्यपट बघताना त्याच्या व इतर काही थोर साहित्यिकांच्या जीवनातील काही विस्मयकारक साम्ये डोळ्यांसमोर येतात. साहीरप्रमाणे मंटोचे त्याच्या वडिलांशी कधी पटले नाही. गालिबसारखा तो ’आधा मुसलमान’ होता आणि दारूच्या जबरदस्त आहारी गेलेला होता.

मंटोचे घराणे मूळचे काश्मिरवासी. नंतर ते पंजाबमध्ये येऊन स्थायिक झाले. मंटोची भावंडे धार्मिक वृत्तीची, प्रतिष्ठित आणि संयमी स्वभावाची होती. मंटो बाकी पहिल्यापासूनच क्रांतिकारक, बंडखोर, नास्तिक आणि बेफाम प्रवृत्तीचा होता. मंटोला वाचनाची जबरदस्त आवड होती. वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून तो उंची सिगारेटी ओढायचा. तरुण वयात शिक्षणावरून लक्ष उडाल्याने तो बेछूटपणे जगत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघे तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसे. तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनॆ केलेल्या मंटोला एकदा लेखन हेच आपले खरे काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा त्याणे तुफानी वेगाने नाटके, निबंध, व्यक्तिचित्रेरं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कथा लिहिल्या.

मंटोने विशेषतः परदेशी साहित्यिकांचे उत्तमोत्त्म साहित्य वाचलेले होते. लिहायला सुरुवात केल्यानंतर प्रथम पत्रकारिता, नंतर हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित लिखाण आणि मग स्वतंत्र नाटके, कथा असा मंटोचा लेखनप्रवास घडला. मंटोच्या मुंबईतील सिनेमाच्या विश्वातील सफरीबद्दल त्याच्या पुस्तकांत फारसे नाही. पण एकंदरीत या मायानगरीला मंटो फारसा पसंत पडला नाही, असेच दिसते. मंटोने त्याच्या मुंबईतील मुक्कामात बकालातले बकाल आयुष्य अनुभवलेले होते. भायखळा आणि नागपाडा भागातल्या अंधाऱ्या चाळी, म्हशींचे गोठे, घोड्यांचे तबेले, इराण्यांची हॉटेले आणि वेश्यांची मोठी वस्ती असलेला फोरास रोड हे सगळे त्याने बघितले, अनुभवले. यातूनच त्याने उर्दू भाषेत ’टंटा, मस्तक, मस्का-पॊलिश, मालपानी, दादा, घोटाला, फोकट, कंडम’ अशा अनेक शब्दांची भर घातली. त्यामुळे मंटोची स्वतःची उर्दू लेखनाची एक शैली विकसित झाली असावी असे वाटते.

१९४८ साली मंटो पाकिस्तानात निघून गेला आणि पाकिस्तानात गेल्याचा त्याला (साहिरप्रमाणेच) पश्चाताप होत राहिला. त्याने अहमद नदीम कासमी यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: ’वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’. पाकिस्तानात त्याने विपुल लिखाण केले हे खरे, पण वैयक्तिक जीवनात त्याची घसरणच होत राहिली. त्याचे मद्यपान तो मुंबईत असतानाच वाढले होते, पाकिस्तानात गेल्यावर मात्र ’दारूनेच त्याला प्यायला सुरुवात केली’.

पाकिस्तानी टपाल खात्याने मंटोंच्या सन्मानार्थ जानेवारी १८, २००५ रोजी एक टपाल तिकिट प्रकाशित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →