राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा पुरस्कार मल्याळम भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.

भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत,

आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २र्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले.

मल्याळममधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक पहिला विजेता म्हणजे १९५४ मध्ये निलाकुयीळ हा चित्रपट. पी. भास्करन आणि रामू करियात यांनी एकत्रितपणे दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मल्याळम लेखक उरुब यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. त्यात एका दलित मुलगी आणि एका उच्चशिक्षित, उच्च जातीच्या शाळेतील शिक्षक यांच्यातील प्रेमसंबंधांची कहाणी सांगण्यात आली आहे. हा चित्रपट मल्याळम सिनेमाच्या इतिहासातील महत्त्वाचा मानला जातो. याच वर्षी नीलाकुयीळ याच्यासह एस. राजन दिग्दर्शित स्नेहा सीमा या चित्रपटास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दिग्दर्शक अटूर गोपालकृष्णन यांच्या सहा चित्रपटांस हा पुरस्कार मिळाला आहे: कोडियेत्तम (१९७७), एलिप्पाथयम (१९८१), मुखमुखम (१९८४), मथिलुकल (१९८९), विधेयन (१९९३) आणि निझालकुथू (२००२).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →