टकमक किल्ला

या विषयावर तज्ञ बना.

टकमक किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात सकवार गावापलिकडे टकमक किल्ला आपल्या उराशी पुरातन जीर्ण अवशेष बाळगत आजही उभा आहे. गडावर फारसे काही उरले नाही. हा गड डोंगर नैसर्गिकरित्या मुख्य डोंगररांगेपासून वेगळा झालेला आहे. हा किल्ला घनदाट जंगलाने घेरलेला आहे. अशा या दुर्गम स्थानी १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी करण्यात आली. माहिम (महिकावती) या राजधानी पासून घाटावर जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. महिकावती ही बिंब राजाने पालघर जवळच्या केळवे-माहीम येथे स्थापन केलेली राजधानी होती. या गडावर जाण्याचा सकवारहून मार्ग अवघड असला तरी ढेकाळे-गांजे मार्गे रस्ता तुलनेने सोपा पण लांब आहे. त्या रस्त्यात काही ठिकाणी खडकावर पायऱ्या खोदल्या आहेत. विरार फाट्याहून सकवार सुमारे १० कि.मी. आहे तर ढेकाळे-गांजे सुमारे २४ कि.मी. आहे. ही गावे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर आहेत.

इतिहास: बिंबदेव राजाचा पुत्र राजा भीमदेवाने १२ व्या शतकात टकमक गडाची निर्मिती केली. कालांतराने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहज-अशेरी या गडांबरोबर हा गड ही जिंकला असावा. शिवाजी महाराजांनंतर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पांनी वसईची मोहिम काढल्यावर टकमक गडाला महत्त्व आले. मराठ्यांनी १७३२ मध्ये टकमक गड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. परंतु मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे हा गड परत पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. ८ एप्रिल १७३७ रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. पंताजी मोरेश्वर हे मराठा साम्राज्यातील एक शूर सरदार होते, ज्यांनी १७३७ मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखालील वसई मोहिमेदरम्यान, पोर्तुगीजांकडून टकमक गड जिंकून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली; हा गड मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेल्या अनेक ठिकाणांपैकी एक होता, जो वसईच्या लढाईतील मराठ्यांच्या विजयाचा महत्त्वाचा भाग आहे. टकमक गडाच्या बेगमीसाठी पेशव्यांनी २५ गावे नेमुन दिली होती. वसई मोहिमेनंतर किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेले. १८ व्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला. त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरील टाकी आणि जाण्याचे मार्ग यांची नासधूस करून किल्ला पुन्हा वसणार नाही याची काळजी घेतली.

सकवार गावातून आपल्याला टकमक गडाचे दक्षिण टोक व त्यापुढे पसरलेले पठार व डोंगराची धार दिसते. डोंगराच्या धारेवरून आपण पठारावर पोहोचतो. टकमक गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी वरून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची वाट गडाच्या दक्षिण टोकावर जाते. हेच टोक पायथ्याच्या सकवार गावातून आपल्याला दिसत असते. या टोकावरून आजूबाजूचा विस्तिर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्वीच्या काळी येथे टेहळणीची चौकी असावी. किल्ल्याच दक्षिण टोक पाहून परत तटबंदीपाशी येऊन पुढे गेल्यावर जोड टाकी पाहायला मिळतात. टाक्यांच्या बाजूला कातळात कोरलेले खड्डे व चर दिसतात. टाकी पाहून टाक्यांच्या समोरच्या बाजूस खाली उतरणाऱ्या पायवाटेने जातांना दोनही बाजूला वास्तूंचे चौथरे कारवीच्या दाट झुडपात लपलेले दिसतात. पुढे पायवाटेला उजव्या बाजूला फाटा फुटतो. येथे दोन बांगडी तोफा पाहायला मिळतात. तोफा पाहून परत पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर दोन वाटा फुटतात. एक वाट डाव्या बाजूला डोंगराच्या कड्याकडे जाते, तर दुसरी वाट सरळ किल्ल्याच्या उत्तरेकडील पठारावर जाते. डाव्या बाजूच्या वाटेने खाली उतरल्यावर २ जोड टाकी दिसतात. त्यांच्यावरच्या बाजूस एक पुरातन टाके पाहायला मिळते. पुढे गेल्यावर ३ टाक्यांचे २ समुह पाहायला मिळतात. ही सर्व टाकी इंग्रजांच्या काळात नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही. शेवटच्या टाक्याच्या पुढे जाऊन निसरड्या वाटेने खाली उतरल्यावर तटबंदीचे दगड विखुरलेले दिसतात. येथे टकमक गडाचे उत्तर टोक आहे. या टोकावरून समोरच्या डोंगरावरील टेहळणीची जागा दिसते. याच ठिकाणी मराठे व पोर्तुगीज यांच्यात झालेल्या युद्धात मराठ्यांनी भूयारामार्गे प्रवेशद्वारापर्यंत पळ काढला होता. ते भूयार आणि प्रवेशद्वार आज अज्ञात आहे. प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग जंगलामुळे नष्ट झालेला आहे. टकमक गडाचा हा भाग पाहून पुन्हा मुख्य पायवाटेपाशी येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च पठारावर जातांना उजव्या बाजूला पाण्याचे एक टाकं दिसत. टकमक गडावरून दक्षिणेला कामण गडाची डोंगररांग दिसते. पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदी दिसते तर पूर्वेला वांदरी तलाव दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा: मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (हायवे) मुंबई पासून ७४ किमी अंतरावर सकवार गावाचा फाटा आहे. या फाट्यावर रामकृष्ण मिशन, सकवार असा मोठा फलक लावलेला आहे. महामार्गावरून उजवीकडे वळून ५०० मीटर अंतरावर सकवार हे टकमक गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावाच्या मागे टकमक गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. सकवार गावातून टकमक गडावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात. सकवार गावात जाण्यासाठी पश्चिम रेल्वे लोकलने वसई किंवा विरार स्थानकावर उतरावे. येथून ६ आसनी शेअर रिक्षाने १० किमी वरील मुंबई - अहमदाबाद महामार्ग गाठावा. महामार्गावरून सकवार गावातील “रामकृष्ण मिशन”ला जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळतात. हायवे वर उतरून सकवार गावात चालत जावे. (वसई ते सकवार - २३ किमी व विरार ते सकवार - २२ किमी आहे.) किल्ल्यावर राहण्याची वा खाण्याची सोय नाही. दूसरा मार्ग विरार फाट्याहून ढेकाळे-गांजे सुमारे २४ कि.मी. आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर ढेकाळे येथे उतरून उजवीकडे गांजे गावाकडे जावे. हा मार्ग लांब असला तरी थोडा सोपा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →